मुंबई : पावसाळ्यात रस्त्यांवर निर्माण होणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिकेने रस्ते विभागाला अधिक सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी रस्ते विभागातील अभियंत्यांना खड्ड्यांबाबत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीचे चोवीस तासांच्या आत निराकरण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच खराब झालेल्या रस्त्यांच्या भागांचे तातडीने पृष्ठीकरण करून वाहतुकीसाठी सुरक्षित बनवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत पावसाळापूर्व तयारी, रस्त्यांची स्थिती आणि विविध उपाययोजनांचा आढावा घेताना त्यांनी हे निर्देश दिले. परिमंडळनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदारांकडून खड्डे निर्धारित तांत्रिक निकषांनुसार आणि उच्च गुणवत्तेने भरले जात आहेत की नाही, याची जबाबदारी संबंधित अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे. प्रत्येक बीटसाठी नियुक्त करण्यात आलेल्या दुय्यम अभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची नियमित प्रत्यक्ष पाहणी करावी, दुचाकीद्वारे फेरफटका मारून रस्त्यांची सद्यस्थिती तपासावी आणि आवश्यक दुरुस्ती तातडीने करून घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या तक्रारींची वाट न पाहता खड्ड्यांची स्वतःहून नोंद घेऊन त्यांचे त्वरित निराकरण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
अभिजीत बांगर यांनी सांगितले की, रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या कायमस्वरूपी कमी करण्यासाठी महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. आतापर्यंत मोठ्या लांबीचे रस्ते काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून उर्वरित कामे पावसाळ्यानंतर हाती घेतली जाणार आहेत. यामुळे भविष्यात खड्ड्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल आणि देखभाल खर्चातही बचत होईल. उपयोगिता वाहिन्यांसाठी खोदण्यात आलेल्या चरांचे पुनर्भरण तांत्रिक निकषांनुसार न झाल्यास पावसाचे पाणी रस्त्याच्या संरचनेत झिरपून रस्ते उखडण्याची प्रक्रिया सुरू होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे खड्डे बुजविताना मास्टिक पद्धतीचा वापर करून गुणवत्तापूर्ण कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्ते देखभालीसाठी नियुक्त कंत्राटदारांकडे आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि साहित्य उपलब्ध आहे की नाही, यावरही नियमित देखरेख ठेवण्यास सांगण्यात आले आहे. मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग तसेच पूर्व मुक्त महामार्ग या महत्त्वाच्या मार्गांवर खड्डे राहणार नाहीत याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच विविध शासकीय प्राधिकरणांच्या अखत्यारीतील रस्त्यांची देखभाल योग्य पद्धतीने व्हावी आणि खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत यासाठीही महानगरपालिकेने पाठपुरावा करावा, असे अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले. यामुळे पावसाळ्यात नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

