अंबरनाथ : अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गेल्या अनेक महिन्यांपासूनची मोठी प्रवासाची अडचण अखेर दूर झाली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विद्यार्थ्यांसाठी ५० आसनी बस उपलब्ध करून देण्यात आली असून, आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष वर्मा यांच्या उपस्थितीत या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. अंबरनाथमध्ये दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या २०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र महाविद्यालयाची कायमस्वरूपी इमारत अद्याप उभी राहिलेली नसल्याने चिखलोली येथील खासगी इमारतीत शिक्षण सुरू आहे. दुसरीकडे, प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना उल्हासनगर आणि कल्याण येथील रुग्णालयांमध्ये जावे लागत असल्याने त्यांच्यावर दररोजचा आर्थिक आणि शारीरिक ताण वाढत होता. शिक्षण एका ठिकाणी, प्रशिक्षण दुसऱ्या शहरात आणि निवासाची व्यवस्था वेगळ्या भागात असल्याने विद्यार्थ्यांना स्वखर्चाने प्रवास करावा लागत होता. या समस्येबाबत स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडे विद्यार्थ्यांनी वाहतूक सुविधेची मागणी केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी ही विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे.
महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न अद्याप न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळे कायमस्वरूपी इमारतीचे काम रखडले आहे. अंबरनाथमध्ये शस्त्रक्रियेसारख्या सुविधा असलेले मोठे शासकीय रुग्णालय नसल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात जावे लागते. यासाठी नुकताच संबंधित करारही करण्यात आला आहे. नव्याने सुरू झालेली बस आता दिवसभर चिखलोली कॉलेज, अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याणमधील विविध रुग्णालयांदरम्यान विद्यार्थ्यांची ने-आण करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही मोठ्या प्रमाणात वाचणार आहेत. दरम्यान, पुढील चार महिन्यांत महाविद्यालयात तिसरी तुकडी दाखल होणार असून विद्यार्थ्यांची संख्या ३०० पर्यंत पोहोचणार आहे. ही वाढती संख्या लक्षात घेता अधिष्ठाता डॉ. संतोष वर्मा यांनी प्रशासनाकडे आणखी २५ आसनी दोन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अतिरिक्त बसेस उपलब्ध झाल्यास सर्व विद्यार्थ्यांना वेळेत प्रशिक्षणासाठी पोहोचणे अधिक सुलभ होईल, असा विश्वास प्रशासन आणि विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

