वृत्तसंस्था : महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेला आणि प्रेक्षकांच्या मनावर गेल्या दशकभर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. या कार्यक्रमानं केवळ हास्यनिर्मितीच केली नाही, तर अनेक कलाकारांना घराघरांत पोहोचवलं. तब्बल दहा वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केल्यानंतर २०२४ मध्ये या कार्यक्रमानं अधिकृतपणे प्रेक्षकांचा निरोप घेतला. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती.
‘चला हवा येऊ द्या’नंतर काही काळातच या मराठमोळ्या कार्यक्रमाचं नवं पर्व झी मराठीवर सुरू करण्यात आलं. नव्या पर्वात कार्यक्रमाचा ढाचा, मांडणी आणि कलाकारांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. मात्र, या बदलांपैकी सर्वांत जास्त चर्चेत राहिला तो म्हणजे, कार्यक्रमाचा कणा मानली जाणारी निलेश साबळे आणि भाऊ कदम यांची अनुपस्थिती. ही लोकप्रिय जोडी नव्या पर्वात दिसणार नाही, हे स्पष्ट होताच अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या संवादशैली, विनोदाची अचूक टायमिंग आणि सहज अभिनयामुळे ही जोडी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचली. त्यामुळेच त्यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यक्रमाचा रंग फिकट पडल्याचं मत अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केलं. दरम्यान, आता या सगळ्या चर्चांवर विराम देणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. निलेश साबळे आणि भाऊ कदम पुन्हा एकदा झी मराठीवर झळकण्यासाठी सज्ज झाले असून, दोघांचंही लवकरच दणक्यात पुनरागमन होणार आहे. मात्र, हे कमबॅक ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून न होता, एका पूर्णपणे नव्या शोमधून होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

