वृत्तसंस्था : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज भाजपाच्या बालेकिल्ल्यात घेतलेल्या जाहीर सभेत भाजपावर कडाडून हल्ला चढवला. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्रिक्षणावरून मला लक्ष्य केले जात आहे. माझ्यावर कोणत्याही प्रकारे हल्ला झाला तर अख्खा देश हलवून टाकेन, अशा शब्दांत बॅनर्जी यांनी भाजपाला इशारा दिला.
राज्यात मतुआ समाजाचे प्राबल्य असलेल्या परिसरात आज ममता बॅनर्जी यांनी एसआयआरविरोधी रॅलीचे आयोजन केले होते. मतुआ हे भाजपाचे पारंपरिक मतदार मानले जातात. तिथूनच ममता यांनी भाजपाला ललकारले. एसआयआर हे एक मोठे षडयंत्र आहे. एसआयआरच्या नावाखाली मागच्या दरवाजाने एनआरसी आणण्याचा केंद्र सरकारचा छुपा अजेंडा आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी घुसखोरीच्या प्रश्नावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या खात्यांतर्गत कार्यरत असलेल्या सीमा सुरक्षा बलालाही धारेवर धरले. पश्चिम बंगालमध्ये घुसखोर आहेत असा प्रचार केला जातो. पण मी म्हणते हे घुसखोर आले कुठून? त्यांना बंगालमध्ये कोणी घुसू दिले, असा सवाल बॅनर्जी यांनी केला.

