मुंबई : मुंबई शहरात साधारण दशकभराहून आधीपासूनच पुनर्वसनाची लाट आली. शहरातील बऱ्याच जुन्या चाळींची, दोन ते तीन मजली इमारतींची जागा पाहता पाहता बहुमजली इमारती आणि आता थेच टॉवरनं घेण्यास सुरुवात केली. ज्या मुंबईत घर घेण्याचं अनेकांचच स्वप्न होतं, त्या मुंबईत Real Estate क्षेत्राला अशी काही झळाळी मिळाली की हे शहर सामान्यांच्या अवाक्याबाहेर जाऊ लागलं. मात्र MHADA च्या मदतीनं शहरात हक्काचं घर खरेदी करण्याचं सामान्यांचं स्वप्न तरीही साकार होत राहिलं. याच पावलावर पाऊल ठेवत आता म्हाडाकडून मुंबईतील मोक्याच्या आणि प्रतिष्ठीत अशा परिसरामध्ये एक मोठा गृहप्रकल्प उभारला जाणार आहे. इथं पाहताना अनेकांचीच नजर कुतूहलानं वर जाईल, कारण म्हाडा तब्बल ८५ मजली टॉवर उभारणार असून, आता त्यासाठीची तयारीसुद्धा सुरू झाली आहे.
मुंबईच्या (Worli BDD Chawl) वरळी बीडीडी चाळीतील येथील रहिवाशांसाठी म्हाडाकडून पुनर्वसन इमारतींचं काम सुरू असतानाच दुसरीकडे म्हाडाने लॉटरीच्या माध्यमातून घरांच्या विक्रीसाठी याच परिसरात पाच गगनचुंबी टॉवर उभारण्याची तयारीसुद्धा सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसा यामध्ये दोन टॉवर 58 मजली, तर तीन टॉवर ८५ मजली असणार आहेत. म्हाडाला यासाठी विमानतळ प्राधिकरणाची परवानगीसुद्धा मिळाली असून पर्यावरण विभागाची मंजुरी मिळताच इथं टॉवर उभारणीच्या कामाला सुरुवात होईल. वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग इथं असणाऱ्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं काम म्हाडा दोन टप्प्यांत पूर्ण करणार आहे. ज्यामध्ये वरळीतील १२१ चाळींमधील ९६८९ रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी ४० मजली ३४ टॉवर उभारले जातील. बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनातून विक्रीयोग्य घरं उभारण्यासाठीसुद्धा म्हाडाला मोठ्या प्रमाणात भूखंड उपलब्ध होणार असून तिथं हे गगनचुंबी टॉवर उभारले जातील. ज्यांतील सदनिकांची विक्री सोडतीच्या माध्यमातून होईल.

