कर्जत : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेले पॅकेज फसवे असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) “काळी दिवाळी” साजरी करून निषेध नोंदवला. कर्जत येथे प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी सरसकट कर्जमाफी, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ७५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम, अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी करण्यात आली.
गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील ६० लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. मात्र सरकारकडून घोषित मदत शेतकऱ्यांच्या खर्चाच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजी असल्याची टीका या वेळी आमदार पवार यांनी केली. सरकारने पॅकेजच्या नावाखाली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देईपर्यंत आम्ही रस्त्यावर संघर्ष करत राहू, असा इशारा त्यांनी दिला.

