ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई ठाणे महापालिका प्रशासनाने हाती घेतली असून त्याचबरोबर न्यायालयाच्या आदेशाने अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडीत करण्याची विशेष मोहीमही राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आतापर्यंत २९५ इमारतींच्या नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. याशिवाय, बोअरवेल बंद करण्याबरोबरच मोटर पंप जप्त करण्यात आले आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत इमारती उभारण्यात येत आहेत. या इमारतींना वीज आणि पाणी पुरवठा होत असल्याने येथे रहिवाशी वास्तव्यास येतात. या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी देताना उच्च न्यायालयाने अशी बांधकामे उभी राहू नयेत यासाठी महत्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यात कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला वीज आणि पुरवठा करण्यात येऊ नये, असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश होते. या आदेशानुसार अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडीत करा, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. यानुसार, पाणी पुरवठा विभागाने अशा इमारतींचा शोध घेऊन त्यांच्या नळजोडण्या तोडण्यासाठी २५ जुलैपासून विशेष मोहिम हाती घेतली आहे.

