कल्याण : कल्याण डोंबिवली शहरांच्या विविध भागात पालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांमधील डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर आणि इतर भागातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे हे कॅमेरे तात्काळ सुरू करण्याची मागणी डोंबिवलीतील रिक्षा चालक संघटनेचे कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे.
पालिकेने शहरांच्या विविध भागात बसविलेल्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे शहरातील गुन्हेगारी, कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्या समाजकंटकांवर नजर ठेवता येते. तसेच रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे रिक्षा वाहनतळ सोडून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवरही या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक विभागाला नजर ठेवता येते. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था राखणे, गु्न्हेगारी कमी करणे, गैरप्रकार रोखण्यासाठी पालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बसविलेले कॅमेरे खूप महत्वाचे आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे मागील काही दिवसांपासून बंद असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे हे सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर पालिकेने सुरू करावेत, अशी मागणी आम्ही करत आहोत असे रिक्षा संघटनेचे कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

