पालघर : राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचाली दरम्यान अपार आयडी अनिवार्य केला असून पालघर जिल्ह्यातील ८६.२१ टक्के विद्यार्थ्यांकडे अपार आयडी उपलब्ध असून जिल्ह्याची वाटचाल राज्याच्या सरासरी वाटचालीच्या जवळपास (८६.७८ टक्के) आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सुमारे २९ हजार विद्यार्थ्यांकडे ग्राह्य धरले जाऊ शकणारे आधार कार्ड नसल्याने अपार आयडी निर्मितीमध्ये जिल्ह्यातील शिक्षण विभागाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
राज्यातील दोन कोटी १५ लाख विद्यार्थ्यांपैकी पालघर जिल्ह्यात सात लाख ७२ हजार विद्यार्थी असून त्यापैकी अवघ्या सहा लाख ६६ हजार विद्यार्थ्यांचे अपार कार्ड तयार झाले आहे. राज्यात गडचिरोली, सातारा, अहिल्यानगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यांची अपार कार्ड टक्केवारी ९० च्या पुढे असताना तसेच गोंदिया, वर्धा, भंडारा, परभणी, इत्यादी जिल्ह्यांची अपार आयडी तयार करण्याची प्रक्रिया जोमात असताना पालघर जिल्हा मागे पडल्याचे दिसून आले आहे. पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपैकी सद्यस्थितीत सात लाख ४३ हजार विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असून २८७३० विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याचे किंवा मान्यीकरण नसलेले आधार कार्ड नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत ९२.७३ टक्केच विद्यार्थ्यांचे अपार कार्ड तयार करण्याची क्षमता उपलब्ध आहे. जिल्ह्यात २६ हजार ९१० विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड मधील माहिती अयोग्य व विसंगती असणारी (मिस मॅच) असून सुमारे ५०० विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड तयार करण्यात आलेले नाही. यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधने तसेच या कामे पाठपुरावा करण्यात व्यग्र राहत आहेत.

