वृत्तसंस्था : गेली चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकत आहेत. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं!’ या लोकप्रिय मराठी मालिकेनंतर त्यांनी ‘बिग बॉस मराठी ५’ या रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. या कार्यक्रमातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समोर आले. त्यानंतर त्यांनी काही काळ कोकणी रंगभूमीवर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे त्या पुन्हा मालिकांमध्ये कधी दिसणार, याची उत्सुकता चाहत्यांना होती. आता त्या ‘दो दुनिया एक दिल’ या हिंदी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत असून त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’नंतर मी मालिका केल्या नव्हत्या. मात्र चाहत्यांची इच्छा होती की, मी हिंदी मालिकेत काम करावे. मार्च महिन्यात वाहिनीकडून फोन आला आणि भूमिका आवडल्यामुळे मी ती स्वीकारली, असे वर्षा उसगांवकर यांनी सांगितले.
या मालिकेत उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर आधारित एका श्रीमंत कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. त्यामध्ये वर्षा उसगांवकर एका धनाढ्य भावाच्या बहिणीची भूमिका साकारत आहेत. या भूमिकेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, मालिकेतील पात्रांसाठी शुद्ध हिंदी आणि उत्तर प्रदेशातील खास लहेजावर विशेष मेहनत घेतली. खलनायकी छटा असलेली आणि ग्लॅमरस स्वरूपाची ही भूमिका साकारताना समाधान मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. कथानकात आपल्या भावाशी सूड घेणाऱ्या बहिणीची व्यक्तिरेखा त्यांनी साकारली आहे. पुनरागमनासाठी वेगळी आणि प्रभावी भूमिका शोधत असल्यामुळे ही मालिका स्वीकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोकणी नाटकांनंतर त्यांनी काही काळ विश्रांती घेतली होती; मात्र या मालिकेमुळे पुनरागमनाला योग्य दिशा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रेक्षकांकडून मालिकेला आणि त्यांच्या भूमिकेला मिळणारा प्रतिसाद पाहून आनंद होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
