ठाणे : ठाणे जिल्ह्यात मा. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली “अरुणोदय सिकलसेल ऍनिमिया विशेष अभियान” दिनांक १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाची अंमलबजावणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या अधिपत्याखाली करण्यात येत असून, जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये ० ते ४० वयोगटातील नागरिकांची सिकलसेल तपासणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तसेच व्यापक जनजागृती मोहीमही राबविण्यात येत आहे.
अभियानाची सद्यस्थिती (दि. १५ ते २१ जानेवारी २०२६) :
या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागांमध्ये एकूण ३९,९७९ घरभेटी देण्यात आल्या. घरभेटीदरम्यान ७५ सिकलसेल रुग्णांना तसेच ७५१ सिकलसेल वाहक व्यक्तींना भेट देऊन आवश्यक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. याच कालावधीत ३१,०२१ व्यक्तींच्या सोल्युबिलिटी तपासण्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये २३६ संशयित सिकलसेल व्यक्ती आढळून आल्या आहेत. त्यापैकी २१४ नमुने इलेक्ट्रोफोरेसिस तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
कार्ड वितरणाची स्थिती :
तपासणी पूर्ण झालेल्या व्यक्तींना पुढीलप्रमाणे कार्ड वितरित करण्यात आले आहे –
- ३०,२३७ व्यक्तींना पांढरे कार्ड
- ४४६ सिकलसेल वाहक व्यक्तींना पिवळे कार्ड
- १०१ सिकलसेल रुग्णांना लाल कार्ड
सिकलसेल ऍनिमिया हा एक अनुवांशिक रक्त विकार असून, वेळेवर तपासणी, समुपदेशन व योग्य उपचारांद्वारे त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर टाळता येऊ शकतात. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील ० ते ४० वयोगटातील सर्व नागरिकांनी सिकलसेल तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर पगरे यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी व स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

