ठाणे : शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना भिवंडी न्यायालयाने ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी पोलिसांनी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता या प्रकरणाचा तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात असून त्याचे धागेदोरे विविध राज्यांपर्यंत पोहोचत असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. या प्रकरणात राजीव कुमार, आकाश कुमार आणि धीरज सिंग या तिघांना अटक करण्यात आली आहे. धीरज सिंग हा हरियाणाचा रहिवासी असून राजीव कुमार आणि आकाश कुमार हे बिहारचे रहिवासी आहेत. हे तिघेही दिल्लीहून महाराष्ट्रात आल्याचे तपासात समोर आले आहे. भिवंडी परिसरात शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका विक्रीसाठी आणल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. हा व्यवहार पूर्ण होण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई करून तिघांना ताब्यात घेतले. न्यायालयात सुनावणीदरम्यान हे प्रकरण आंतरराज्यीय स्वरूपाचे असण्याची शक्यता असल्याने त्याचा सखोल तपास करणे आवश्यक असल्याचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. विजय मराठे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायाधीश एस. एम. सुतार यांनी आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या कालावधीत आरोपींची सखोल चौकशी करून प्रश्नपत्रिका नेमकी कुठून मिळाली, ती महाराष्ट्रात कशी आणण्यात आली आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास केला जाणार आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची घटना उघड झाल्यानंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणात भिवंडी परिसरात कारवाई करत ठाणे पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकाकडे सोपविण्यात आला आहे. या पेपरफुटीमागील मुख्य सूत्रधार कोण आहेत, प्रश्नपत्रिका फुटीचे जाळे किती व्यापक आहे आणि त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक विविध राज्यांमधील दुव्यांची पडताळणी करत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याशी चर्चा करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. परीक्षा प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास कायम राखण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी या संपूर्ण प्रकरणातील प्रत्येक दुव्याचा बारकाईने तपास करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विविध तपास यंत्रणा समन्वयाने काम करत असून तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

