ठाणे : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार, २८ जून २०२६ रोजी शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या पाच तालुक्यांमध्ये एकूण १ हजार ६९९ लसीकरण केंद्रांवर १ लाख १७ हजार २४९ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस पाजण्यात आला. तालुकानिहाय आकडेवारीनुसार शहापूरमध्ये २६ हजार १७३, मुरबाडमध्ये ११ हजार ६९२, भिवंडीत ३५ हजार ६७३, कल्याणमध्ये २५ हजार ९५२ आणि अंबरनाथमध्ये १७ हजार ७५९ बालकांचे लसीकरण करण्यात आले. या मोहिमेचा शुभारंभ भिवंडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा येथे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते, तर कल्याण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे येथे आमदार राजेश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने ही मोहीम यशस्वीपणे राबविली.
मोहिमेदरम्यान राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक डॉ. बाळासाहेब सोनावणे, ठाणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. अशोक नांदापुरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती शिंदे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. बालाजी गावडे तसेच जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी संजय जाधव यांनी विविध लसीकरण केंद्रांना भेट देऊन मोहिमेचे पर्यवेक्षण केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले की, रविवारी डोस घेऊ न शकलेल्या सर्व बालकांपर्यंत पुढील तीन दिवस घरभेटीद्वारे पोहोचून लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांनी प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक डोस पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित करत पालकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. पोलिओसारख्या गंभीर आजाराचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक बालकाचे लसीकरण आवश्यक असून, या जनजागृती मोहिमेत सर्व पालकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

