नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील समाजकल्याण विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा व वसतिगृहात रविवारी १२ जुलै रात्री अन्नातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली. रात्रीचे जेवण केल्यानंतर ४० ते ५० विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने एकच खळबळ उडाली. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी देविदास बाशिंगे, पार्थ धिवरे, आदित्य सूर्यवंशी, पंकज कुवर, प्रदीप आणि मनोहर पाटील या सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. रविवारी सायंकाळी वसतिगृहातील २१७ हून अधिक विद्यार्थ्यांनी शेवग्याची भाजी, भात आणि पोळ्यांचे जेवण केले होते.
काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांना उलट्या सुरू झाल्या, तर काही विद्यार्थी जागीच कोसळल्याने वसतिगृहात धावपळ उडाली. रुग्णवाहिका आणि इतर वाहनांच्या मदतीने बाधित विद्यार्थ्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. उर्वरित विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पालकांनी रुग्णालयात धाव घेत वसतिगृह प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला. विद्यार्थ्यांनीही वसतिगृहात वारंवार निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याची तक्रार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना दमदाटी केली जात असल्याचाही दावा त्यांनी केला. “जे विद्यार्थ्यांनी जेवण केले नव्हते, त्यांना कोणताही त्रास झाला नाही,” असे उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, प्रांताधिकारी दीपक गिरासे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल झाले. विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी अन्नाचे व उलट्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून वसतिगृहातील समस्यांच्या निराकरणासाठी समिती स्थापन करून महिनाभरात आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या घटनेमुळे समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांतील अन्नाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

