मुंबई : मुंबई-पुणे प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. या मार्गाचे १० पदरीकरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. यामुळे वाहतूक कोंडी फुटणार आहे. या एक्सप्रेस वेच्या विस्ताराचे काम पावसाळ्यानंतर सुरु होणार आहे. हे काम पुढच्या ३ वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. २०२९-२०३० पर्यंत हो काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. दरम्यान, हा एक्सप्रेस वे १० पदरी झाला तर मुंबई पुणे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. याचसोबत काम सुरु असताना सध्याच्या वाहतुकीला अडथळा येऊ नये, यासाठी टप्प्याटप्प्याने काम केले जाणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसच्या विस्तारासाठी खूप निधी लागणार आहे. हा निधी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन उभारला जाणार आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी टोल वसुलीच्या मुदतीत १५ वर्षांची वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे टोल मुदत २०४५ वरुन २०२६० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

