मुंबई : महाराष्ट्रातील खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून नववी आणि दहावीच्या वर्गांसाठी किमान २० पट (विद्यार्थी संख्या) अनिवार्य करण्यात आला आहे . १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार, या निकषापेक्षा कमी पटसंख्या असलेले वर्ग बंद करण्यात येणार आहेत. या नवीन नियमांमुळे अनेक शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची भीती निर्माण झाली आहे. ज्या माध्यमिक शाळांमध्ये नववी किंवा दहावीच्या वर्गात किमान २० विद्यार्थी नसतील, असे कमी पटसंख्येचे वर्ग आता बंद केले जातील. शिक्षण विभागाकडून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठीची संचमान्यता (Sancha-Manyata) अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू असून, या नवीन अटीनुसारच शिक्षकांची पदे मंजूर केली जाणार आहेत. नव्या नियमानुसार, नववी आणि दहावीच्या प्रत्येक तुकडीसाठी किमान २० विद्यार्थी असणे आवश्यक आहे. जर एका वर्गात १९ आणि दुसऱ्यात २१ विद्यार्थी असतील, तरीही अटीची पूर्तता न झाल्यामुळे शिक्षक मंजुरीमध्ये अडचणी येऊ शकतात. दुर्गम किंवा डोंगराळ भागातील शाळांसाठी ही अट शिथिल करून १५ विद्यार्थी करण्याची शक्यता सरकार विचारात घेत आहे. या नवीन निर्णयामध्ये मुख्याध्यापक पदासाठी असलेल्या पटसंख्येच्या अटीमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.

