पुणे : गणेशोत्सवासह सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांच्या ताटात जाणारे पनीर आणि खवा कितपत सुरक्षित व शुद्ध आहे, याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यातील गजबजलेल्या बुधवार पेठ परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गुप्त माहितीच्या आधारे अचानक धाड टाकत तब्बल १५ टन संशयित पनीर आणि खव्याचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून सुमारे १० हजार किलो पनीर आणि ५ हजार किलो खवा असा एकूण १५ हजार किलो साठा ताब्यात घेतला. बुधवार पेठ हा पुणे शहरासह परिसरातील हॉटेल्स, मिठाई दुकाने आणि इतर व्यावसायिकांना पनीर व खव्याचा प्रमुख पुरवठा करणारा भाग मानला जातो. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात जप्ती झाल्याने या मालाच्या गुणवत्तेबाबत आणि पुरवठा साखळीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार हा संपूर्ण माल परराज्यातून दोन ते चार मोठ्या कंटेनरमधून पुण्यात आणण्यात आला होता. सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचा माल बाजारात विक्रीसाठी आणण्याचा प्रयत्न झाला होता का, याचाही तपास FDA कडून सुरू करण्यात आला आहे.
FDA ला मिळालेल्या गुप्त आणि विश्वासार्ह माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत संपूर्ण साठा जप्त केला. तपास पथकाने घटनास्थळावरून पनीर आणि खव्याचे विविध नमुने गोळा केले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच या मालाची गुणवत्ता, भेसळ अथवा निकृष्ट दर्जाबाबत अंतिम निष्कर्ष समोर येणार असून त्यानुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. याशिवाय हा साठा नेमका कोणाचा होता, तो कोणत्या व्यापाऱ्यांकडे किंवा व्यावसायिकांकडे वितरित होणार होता आणि या पुरवठ्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही सखोल तपास सुरू आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी FDA कडून बाजारपेठांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. नागरिकांनीही पनीर, खवा आणि दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी तसेच संशयास्पद अन्नपदार्थ आढळल्यास तत्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

