ठाणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य स्मारक दुसऱ्यांदा आचार संहितेच्या कचाट्यात सापडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात विशेष निधीतून हे स्मारक तयार करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी बांधून तयार असलेले हे स्मारक विधानसभा निवडणुकीतही जनतेसाठी खुले होऊ शकले नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराचा वारसा सगळेच पक्ष सांगतात. विशेषतः शिवसेना पक्ष या वारसाचा स्वतःला भक्कम दावेदार समजतो. हा दावा सांगतच या मतदार संघात दोन्ही शिवसेनेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे केदार दिघे यांच्यात येथे दुहेरी लढत सुरू आहे. हे दोन्ही उमेदवार आणि त्यांचे पक्ष महाराजांच्या वारसासोबतच स्व. आनंद दिघे यांचेही वारस असल्याचे ठणकावून सांगतात. मात्र असे असतानाही सात महिन्यांपासून तयार असलेले येथील छत्रपती संभाजी महाराज शौर्य स्मारक जनतेसाठी खुले करण्यात आलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही हे स्मारक आचारसंहितेमुळे जनतेसाठी खुले होऊ शकले नाही. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी त्याचे उद्घाटन होऊन ते जनतेसाठी खुले होईल असे वाटले होते. स्थानिक माजी नगरसेवकांकडून या स्मारकाच्या उद्घाटनाची तयारीही सुरू करण्यात आली होती. उद्घाटनासाठी मुख्यमंत्री तथा खासदारांची वेळ देखील निश्चित झाली होती. त्यासाठी स्मारकावर पुन्हा रंग रंगोटी करण्यात आली होती; मात्र सगळी तयारी झालेली असतानाही त्याचे उद्घाटन झाले नाही. विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होण्याच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातच नव्हे तर राज्यात अनेक प्रकल्पांचा उद्घाटनाचा धडाका लावला होता. परंतु ५० लाखांचा खर्च करून बांधण्यात आलेल्या कोपरी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला मात्र उद्घाटनाचा मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे शिव – शंभू प्रेमीं मतदारांमध्ये नाराजी पसरलेली पाहायला मिळत आहे. या स्मारकावर छत्रपती संभाजी महाराज यांचा सिंहासोबत लढतानाचा पुतळा असून त्यांच्या भोवताली किल्ल्याची तटबंदी उभी करण्यात आली आहे. महाराजांच्या पायथ्याशी कवी कलश यांचे शिल्पचित्र बसवले जाणार आहे. या स्मारकाला ” धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शौर्य स्मारक ” असे नाव देण्यात आले आहे. मात्र महाराज केवळ धर्मवीर नव्हते, तर ते या राज्याचे स्वराज्य रक्षक देखील होते, त्यामुळे त्यांना स्वराज रक्षकाची उपाधी लावावी अशी मागणी काही राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती. त्यामुळे धर्मवीर की स्वराज्य रक्षक या उपाधीच्या वादात या स्मारकाचे उद्घाटन सापडल्याचे बोलले जात आहे.

