भाईंदर : माघ महिन्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त स्थापन झालेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेने शहरात नऊ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. त्यामुळे नागरिकांनी नैसर्गिक जलस्रोतांचा वापर टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांऐवजी केवळ कृत्रिम तलावातच करण्यात येणार आहे. त्यानुसार उत्तन समुद्रकिनारा, सुभाषचंद्र बोस मैदान, भाईंदर जेट्टी,जेसल पार्क चौपाटी, आनंद दिघे मैदान,शिवार गार्डन,घोडबंदर स्मशानभूमी उघाडी, साईदत्त तलावआणि जरीमरी तलाव येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोठ्या आकाराच्या म्हणजे सहा फुटांपेक्षा उंच मूर्तींच्या विसर्जनासाठी भाईंदर पश्चिम जेट्टी व भाईंदर पूर्वेतील जेसल पार्क चौपाटी येथे हायड्रॉलिक क्रेनची सोय करण्यात आली आहे.नागरिकांनी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त राधाविनोद शर्मा यांनी केले आहे.

