मुंबई प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी 3 दिवसांचा महाराष्ट्र दौरा केला होता. या दौऱ्याच्या शेवटी निवडणूक आयोगाने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगाने 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या ताबडतोब बदल्या करा, अशा सूचना दिल्या होत्या. राज्य सरकारने या सूचनांचे पालन करत 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ११ पोलीस निरीक्षकांची बदली मुंबईत बदली झाली आहे. निवडणूक आयोगाने मुंबईतील पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांची सूचना राज्य पोलीस दलाला केली होती. मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या मुंबईबाहेर करण्यात आल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाने राज्य सरकारला अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या. त्या सूचना राज्य सरकारने पाळल्या नव्हत्या. त्यामुळे काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्टासह इतर 4 राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. या पत्रात 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आयोगाने राज्य सरकारवर ताषेरे ओढले होते.
लोकसभा निवडणुकीवेळी मुंबईतील अनेक मतदारसंघांवर झालेल्या गैरसुविधांबद्दलही निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली होती. मुंबईतील मतदान केंद्रांवर बेंच, पंखे , पिण्याचे पाणी सुविधा उपलब्ध असल्याचे खात्री करण्याचे अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोगाने आता राज्य सरकारला सूचना दिल्यानंतर आता राज्य सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला.