मुंबई : गणेशोत्सवानिमित्त लालबाग परिसरात दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असताना चोरट्यांनीही सक्रिय होत भाविकांना लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोकड चोरीच्या अनेक घटना घडल्या असून, या प्रकरणी मध्य प्रदेशातील इंदूर येथील दोन तरुणांना काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी वर्षा फोपाळे (वय ६७) या दर्शनाच्या रांगेत उभ्या असताना गर्दीत साडी सावरत असताना त्यांच्या गळ्यातील सुमारे ₹७० हजार किमतीचा १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार चोरीला गेला. तसेच धनंजय बलसरफ (वय ४९) यांच्या ₹९० हजार किमतीच्या १३ ग्रॅम सोन्याच्या साखळीचीही चोरी झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षा रक्षक मायकल नाडर (वय २८) यांच्या खिशातून ₹२५ हजार किमतीचा मोबाईल आणि ₹२,३०० रोख रक्कम चोरीला गेली. चोरी लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला, त्यानंतर उपस्थित भाविकांनी दोन संशयितांचा पाठलाग करून त्यांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आरिफ सक्सेनसिंग गुज्जर (वय २४) आणि सोमनाथ समनसिंग राठोड (वय २३) अशी असून, दोघेही मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी आहेत. दरम्यान, गणेश गल्लीतील ‘मुंबईचा राजा’ येथे दर्शनासाठी आलेल्या आरती कावळे (वय ६०) यांच्या सुमारे ₹२ लाख किमतीच्या २५ ग्रॅम सोन्याच्या साखळीची चोरी झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा स्वतंत्र तपास सुरू असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींचा या आणि इतर चोरीच्या घटनांशी काही संबंध आहे का, याचा पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने भाविकांनी सोन्याचे दागिने, मोबाईल, पाकीट आणि इतर मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी, तसेच संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन काळाचौकी पोलिसांनी केले आहे.

