नवी मुंबई : समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य आणि समृद्ध संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये राहणाऱ्या कोकणवासीयांसह चाकरमान्यांचा प्रवास आता अधिक जलद, सोयीस्कर आणि आरामदायी होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली मुंबई–सिंधुदुर्ग थेट विमानसेवा पुन्हा सुरू होणार असल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून पुणे, हैदराबाद आणि बेंगळुरू या शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध आहे. मात्र मुंबईकडून थेट विमानसेवा बंद असल्याने कोकणात जाणाऱ्या नागरिकांना रेल्वे किंवा रस्ते वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागत होते.
विशेषतः गणेशोत्सवासारख्या सणांच्या काळात रेल्वे तिकिटांची कमतरता, महामार्गांवरील प्रचंड वाहतूक कोंडी आणि दीर्घ प्रवासामुळे चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत होती. आता ही थेट विमानसेवा पुन्हा सुरू होत असल्याने प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून सणासुदीच्या काळातील प्रवाशांची अडचणही दूर होणार आहे. या नव्या विमानसेवेचा लाभ केवळ स्थानिक नागरिकांनाच नव्हे, तर व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि पर्यटकांनाही होणार आहे. थेट हवाई संपर्कामुळे सिंधुदुर्ग आणि कोकणातील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल, तसेच स्थानिक व्यवसाय आणि आर्थिक विकासालाही गती मिळण्याची अपेक्षा आहे. महत्त्वाचे म्हणजे फ्लाय ९१ ही विमान कंपनी येत्या १५ ऑगस्टपासून नवी मुंबई ते सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ या मार्गावर थेट विमानसेवा सुरू करणार आहे. या सेवेमुळे नवी मुंबई ते कोकण हा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह इतर प्रवाशांसाठी हा पर्याय अधिक वेगवान, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार असून, कोकणाशी हवाई संपर्क अधिक मजबूत होणार आहे.

