जेजुरी : आषाढी वारीच्या उत्साहात संपूर्ण राज्य भक्तिमय वातावरणात रंगले असतानाच सासवड–जेजुरी मार्गावर एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक अपघात घडला आहे. जेजुरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला झालेल्या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे वारकरी संप्रदायासह परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की काही महिलांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही. या दुर्घटनेचे काही व्हिडीओही समोर आले असून त्यामध्ये घटनास्थळावरील धावपळ आणि मदतकार्याचे दृश्य दिसत आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात सासवड–जेजुरी मार्गावरील बेलसर टोलनाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर घडला. लोहा (जिल्हा नांदेड) येथील रंगनाथ महाराज पोखरबिसीकर यांच्या दिंडीसोबत असलेल्या ट्रकचा आणि सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीतील महिला वारकऱ्यांचा हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या धडकेत तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
अपघातानंतर स्थानिक नागरिक, इतर वारकरी आणि प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमी महिलांना तातडीने जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर शर्थीचे उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलांची नावे नंदा पवार (वय ६०), माधवी राजाराम सलगरे (वय ५५) आणि राजश्री शंकर भोसले (वय ५५) अशी असून त्या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले होते की वाहनात तांत्रिक बिघाड झाला होता, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अपघातामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे आषाढी वारीच्या आनंदावर शोककळा पसरली असून मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

