मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भविष्यात केंद्राच्या राजकारणात जाण्याची चर्चा अनेक वर्षांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेला आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी नव्याने हवा दिली आहे. फडणवीस केंद्रात गेल्यास राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सर्वात प्रबळ दावेदार ठरतील, असे आपले राजकीय आकलन असल्याचा दावा त्यांनी केला. राज्याचे हित जपणारा, राज्याला योग्य दिशा देणारा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवणाऱ्या व्यक्तीला नेहमी शुभेच्छा दिल्या पाहिजेत, असेही राऊत म्हणाले. तसेच, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. “तुम्हाला कदाचित वाटत असेल की मी मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्या कोणाचे नाव घेईन, मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे पाहता विदर्भातील चंद्रशेखर बावनकुळे हेच देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात योग्य नेते आहेत,” असे राऊत यांनी सांगितले. बावनकुळे हे सर्वांशी संवाद साधणारे, सर्वांना सोबत घेऊन जाणारे आणि संघटनात्मक पातळीवर सक्षम नेतृत्व करणारे नेते असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संजय राऊत यांनी पुढे दावा केला की, देवेंद्र फडणवीस यांची केंद्राच्या राजकारणात नियुक्ती झाल्यास मुख्यमंत्रीपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचाच सर्वप्रथम विचार केला जाईल. इतकेच नव्हे, तर स्वतः फडणवीसही बावनकुळे यांच्या नावाची शिफारस करतील, असे आपले स्पष्ट राजकीय आकलन असल्याचे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य शर्यतीत भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या नावाचाही उल्लेख होत असला तरी, त्यांचा राजकीय प्रवास आणि कामगिरीचा संदर्भ देत राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली. “गिरीश महाजन यांचा ट्रॅक रेकॉर्ड अत्यंत खराब आहे,” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य दावेदारांच्या चर्चेतून महाजन यांना बाजूला काढले. दरम्यान, संजय राऊत यांनी व्यक्त केलेले हे मत त्यांच्या राजकीय आकलनावर आधारित असून, मुख्यमंत्रीपदाबाबत भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीकडून कोणतीही अधिकृत भूमिका किंवा घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य बदलांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

