नवी दिल्ली : देशभरातील लाखो टेलिग्राम युझर्ससाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. NEET-UG 2026 पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टेलिग्रामवर लागू केलेली तात्पुरती बंदी आता संपुष्टात आली असून मेसेजिंग सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. १६ जून रोजी लागू करण्यात आलेले हे निर्बंध २२ जूनपर्यंत मर्यादित कालावधीसाठी होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सेवा पूर्ववत करण्यात येत असून अनेक युझर्सना पुन्हा अॅप वापरता येऊ लागले आहे. केंद्र सरकारने ही कारवाई राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) पुनर्परीक्षेदरम्यान गैरप्रकार, बनावट प्रश्नपत्रिका विक्री आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीला आळा घालण्यासाठी केली होती. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A अंतर्गत ही तात्पुरती बंदी लागू करण्यात आली होती.
सरकारच्या म्हणण्यानुसार, काही गट आणि चॅनेल्सद्वारे बनावट प्रश्नपत्रिका विक्री, पेपरफुटीच्या अफवा आणि विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. तसेच टेलिग्रामच्या ‘मेसेज एडिटिंग’ फीचरचा गैरवापर करून परीक्षा झाल्यानंतर संदेश बदलून पेपर आधीच लीक झाल्याचा खोटा आभास निर्माण करण्याचे प्रकार आढळल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे केवळ काही चॅनेल्सवर कारवाई करण्याऐवजी संपूर्ण प्लॅटफॉर्मवर मर्यादित कालावधीसाठी निर्बंध लावण्यात आले. या निर्णयाला Delhi High Court नेही पाठिंबा दिला होता. दरम्यान, टेलिग्रामवरील सामान्य मेसेजिंग सेवा पुन्हा सुरू झाली असली तरी भारतातील ‘मेसेज एडिटिंग’ सुविधा ३० जूनपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश कायम आहेत. सरकारने स्पष्ट केले आहे की बंदी वाढवण्याचा सध्या कोणताही निर्णय नाही. तसेच पुनर्परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पडावी आणि विद्यार्थ्यांचे हित जपले जावे हा या कारवाईमागील मुख्य उद्देश असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
