वसई : वसईमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, विविध जातींच्या आंब्यांसह ग्रामीण भागातील पारंपरिक आणि कृषी उत्पादनांची खास मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. वसई शेतकरी सहकारी संस्थातर्फे आयोजित हा महोत्सव २२ ते २४ मे दरम्यान रंगणार आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात असून, स्थानिक शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा यामागचा उद्देश आहे. महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, २२ मे रोजी सायंकाळी ४ वाजता प्रयोगशील शेतकरी मनोहर भोईर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनात वसई, बोर्डी, वाडा आणि गोरेगाव परिसरातील शेतकरी स्वतः पिकवलेले विविध प्रकारचे आंबे मांडणार आहेत. यात नीलम, दशहरी, वनराज, बदामी, बारमाही, आम्रपाली, सुवर्ण रेखा, लंगडा, रायवळ, पायरी, मलगोबा, केसर, हापूस, सोनपुरी, राजापुरी आणि तोतापुरी यांसारख्या अनेक लोकप्रिय आंब्यांचा समावेश असणार आहे. काही आंबे विक्रीसाठी उपलब्ध असतील, तर काही केवळ प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.
आंब्यांव्यतिरिक्त या महोत्सवात विविध ग्रामीण आणि पारंपरिक उत्पादनांनाही विशेष स्थान देण्यात आले आहे. वाड्यातील दादा वाडेकर यांनी तयार केलेली शेतीची अवजारे, लाकडी घाण्यावर तयार होणारे सुखदा कंपनीचे तेल, वारली चित्रकला तसेच विविध महिला बचत गटांनी तयार केलेले मसाले आणि लोणची प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत. तसेच Aryama Foods यांची सुकेळी उत्पादने आणि बोर्डी येथील ऑराग्रीनतर्फे चिकूपासून तयार केलेले लोणचे, सुकामेवा आणि इतर पदार्थही विक्रीस ठेवले जाणार आहेत. याशिवाय आदिवासी बांधवांनी बांबूपासून तयार केलेल्या शोभेच्या आणि दैनंदिन वापरातील वस्तूही महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहेत. या महोत्सवाला भेट देऊन स्थानिक शेतकरी आणि ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सोसायटीचे अध्यक्ष आशय राऊत यांनी केले आहे.

