ठाणे : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार, अवैध साठेबाजी आणि बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्याच्या सीमेलगतच्या प्रमुख मार्गांवर विशेष चेकनाके उभारण्यात येणार असून, संशयित वाहनांची तपासणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना योग्य वेळी आणि योग्य दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृषी उपयोगासाठी असलेले निमकोटेड युरिया खत औद्योगिक वापरासाठी वळवले जाणार नाही, यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. काही ठिकाणी युरिया खताची अवैध साठेबाजी, परराज्यात किंवा इतर जिल्ह्यांत बेकायदेशीर वाहतूक, जादा दराने विक्री आणि अनधिकृत वितरण होत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या खरीप हंगामासाठी पुरेसा खतसाठा उपलब्ध असला तरी कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार करण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी प्रशासन विशेष दक्षता घेत आहे. या विशेष कारवाईदरम्यान कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी संयुक्तपणे वाहनांची तपासणी करणार आहेत.
युरिया खत वाहतूक करणाऱ्या वाहनांची कागदपत्रे, परवाने, बिले आणि साठ्याची पडताळणी केली जाणार असून, कोणत्याही वाहनात मोठ्या प्रमाणात युरिया खत आढळल्यास त्याची सखोल चौकशी करण्यात येईल. नियमभंग किंवा अनियमितता आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. कृषी विकास अधिकारी मुनीर बचोटिकर यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना वेळेत आणि योग्य दरात खत उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. युरिया खताचा काळाबाजार, अवैध वाहतूक किंवा साठेबाजी करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही.” प्रशासनाने शेतकऱ्यांना अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खत खरेदी करण्याचे आवाहन केले असून, जादा दराने विक्री किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
