मुंबई : राज्यपाल जिष्णु देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल पद्धतीने स्व-गणना करत भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जनगणना-२०२७ मोहिमेचा शुक्रवारी मुंबईतून शुभारंभ केला. तसेच, या राष्ट्रीय जनगणनेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन देखील राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जनगणना-२०२७ अंतर्गत १ मे पासून प्रथम टप्पा अर्थात स्व-गणनेला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबई येथील लोकभवन या शासकीय निवासस्थानी स्व-गणना करून जनगणना-२०२७ मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांच्या पत्नी सुधा देव वर्मा उपस्थित देखील उपस्थित होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वर्षा या शासकीय निवासस्थानी स्व-गणना करून जनगणना-२०२७ मध्ये नोंद केली.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्र शेखर, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांच्यासह अन्य मान्यवरांनीही स्व-गणना करुन जनगणना मोहीमेत सहभाग नोंदवला. जनगणना-२०२७ ही दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांना स्वतः डिजिटल पद्धतीने स्व-गणना करायची आहे. यासाठी https://se.census.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून स्व-गणना करावी लागेल. तसेच, यामध्ये दिलेल्या ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. अवघ्या दहा मिनिटात स्व-गणना करता येणे शक्य आहे. याच अंतर्गत १६ मे ते १४ जून या कालावधीत जनगणना प्रगणक घरोघरी जाऊन माहितीचे सत्यापन आणि पडताळणी करतील. जनगणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ मध्ये सुरू होईल. ज्यामध्ये प्रत्यक्ष घरोघरी जाऊन गणना करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त व अतिरिक्त प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विपिन शर्मा यांनी दिली. मुंबईत महानगरपालिकेच्या वतीने सुमारे २५ हजार कर्मचारी जनगणनेसाठी प्रगणक म्हणून कार्यरत आहेत. मुंबईकर नागरिकांनी या जनगणनेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. तसेच, जनगणनेसाठी गृहभेटी देणाऱ्या प्रगणकांना योग्य माहिती द्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. विपिन शर्मा यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.

