मुंबई : येत्या १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन पासून राज्यातील परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मोटार परिवहन विभागाकडून राज्यभरातील ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान चालकांना मराठी भाषा वाचता आणि लिहिता येते का, याची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकांविरोधात कठोर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. या निर्णयामुळे स्थानिक भाषेचा सन्मान राखण्याबरोबरच प्रवाशांशी संवाद सुलभ होण्यास मदत होणार असल्याचेही सांगण्यात आले.
मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की, रिक्षा व टॅक्सी चालकांना परवाना देताना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे हा नियम पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. मात्र मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये अनेक चालकांना मराठीत संवाद साधता येत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. काही चालक जाणूनबुजून मराठी बोलण्याचे टाळतात, असेही निदर्शनास आले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, ज्या राज्यात आपण व्यवसाय करतो त्या राज्याची भाषा शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि त्या भाषेचा आदर राखणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे १ मेपासून सर्व चालकांसाठी मराठी वाचणे आणि लिहिणे अनिवार्य राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या संबंधित परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

