मुंबई : मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा फटका आता भारताच्या कुक्कुटपालन उद्योगाला बसू लागला आहे. आखाती देशांकडे होणाऱ्या निर्यातीमध्ये अडथळे निर्माण झाल्याने देशांतर्गत बाजारात अंड्यांचा पुरवठा वाढला असून, त्याचा थेट परिणाम किमतींवर झाला आहे. परिणामी अंड्यांचे दर घसरले असून उत्पादक आणि व्यापाऱ्यांसमोर नवे आव्हान उभं राहिलं आहे.
सध्या अंड्यांची घाऊक किंमत प्रति अंडे ७ रु वरून ४ रु पर्यंत घसरले आहेत. म्हणजेच १०० अंडी फक्त ४०० रुपयांमध्ये उपलब्ध होत आहेत. किरकोळ बाजारातही पूर्वी ८ रु ते ९ रु दराने विकली जाणारी अंडी आता ५.५० रु ते ४ रु दराने मिळत आहेत. अंड्यांचे दर घसरल्यामुळे कुक्कुटपालकांचे उत्पन्न कमी झाले असून उत्पादन खर्च भागवणेही कठीण झाला आहे. सुरक्षा कारणांमुळे आणि वाहतूक मार्गांतील अडथळ्यांमुळे हा व्यापार जवळपास ठप्प झाला आहे. युद्धाआधी भारतातून दररोज सुमारे १ कोटी अंड्यांची निर्यात आखाती देशांकडे होत होती. विशेष म्हणजे, भारतातील निर्यातक्षम अंड्यांपैकी जवळपास ८० टक्के अंडी या देशांकडेच पाठवली जातात. निर्यात थांबल्याने मोठ्या प्रमाणात अंड्यांचा साठा देशांतर्गत बाजारात येत आहे, त्यामुळे पुरवठा वाढून दर घसरत आहेत. व्यापाऱ्यांसाठी ही परिस्थिती कठीण असली तरी सामान्य ग्राहकांसाठी मात्र ही दिलासादायक ठरली आहे. कमी किमतीमुळे अंड्यांची मागणी वाढली असून, अनेकांनी पुन्हा अंड्यांचा आहारात समावेश करण्यास सुरुवात केली आहे. एकूणच काय तर, महागाईच्या पार्श्वभूमीवर अंडी हा स्वस्त आणि पौष्टिक प्रथिनांचा स्रोत ठरत आहेत.

