पालघर : विरार ते वलसाडदरम्यान प्रवास करणाऱ्या कर्मचारी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. वांद्रे-उधना ही विशेष रेल्वे आता दररोज धावणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीला मंजुरी दिली असून या निर्णयामुळे कर्मचारी, व्यापारी, तसेच, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वांद्रे-उधना विशेष रेल्वे आठवड्यातून केवळ ५ दिवस धावत असल्यामुळे गुरुवार व शुक्रवार या दोन दिवशी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. विशेषतः बोर्डी रोड, घोलवड, डहाणू रोड, वानगाव, केळवे रोड, उमरोली, सफाळे आणि वैतरणा या स्थानकांवरील कर्मचारी, व्यापारी, विद्यार्थी तसेच, दैनंदिन प्रवासी यांना सुरक्षितता व प्रवासाच्या दृष्टीनं मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता या निर्णयामुळे विरार ते वलसाड दरम्यान प्रवास करणाऱ्या असंख्य कर्मचारी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

