मुंबई : राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ठाकरे बंधुंच्या युतीची अखेर आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा केली. मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत ही घोषणा करण्यात आली.
सुरूवातीला शिवसेना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. “आम्ही दोघेही आज इथे बसलो आहोत. आमचे आजोबा प्रबोधनकार संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत माझे वडील बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे या सर्वांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत संघर्ष केला. मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. त्याची आज आठवण होणे स्वाभाविक आहे. कारण मुंब महाराष्ट्राला मिळाल्यावर उपरे महाराष्ट्राच्या उरावर नाचायला लागले त्यावेळी न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म द्यावा लागला. मुंबई, महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे मनसुबे आखले होते. आज त्यांचेच प्रतिनिधी दिल्लीत बसलेत. ते आजही मुंबईच्या चिंधड्या उडवण्याचे मनसुबे आखत आहेत. त्यामुळे आता जर आपण भांडत राहिलो तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी केलेल संघर्षाचा अपमान असले. आमचे कर्तव्य म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. मी गेल्यावेळीच म्हटले होते. आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी. मुंबई आणि महाराष्ट्रावर वाकड्या नजरेने, कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचा खात्मा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत. आज महाराष्ट्रच नाही तर देश बघत आहे. विधानसभेवेळी भाजपने एक अपप्रचार केला होता. बटेंगे तो कटेंगे, तसेच मी मराठी माणसाला सांगतो. आता चुकाल तर संपाल, आता फुटाल तर पूर्णपणे संपूरण जाल त्यामुळे तुटू नका फुटू नका, महाराष्ट्र, मराठीचा वसा टाकू नका, हाच एक संदेश आमच्या युतीच्या निमित्ताने महाराष्ट्राला देतो. असा संदेश उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

