मुंबई : भारताच्या उद्योग जगतातील एक अत्यंत महत्त्वाचं व प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारे पद्मभूषण एयर कमांडर डॉ. विजयपत कैलाशपत सिंघानिया यांचं शनिवारी वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालं. रविवारी (दि. २९ मार्च) शासकीय इतमामात चंदनवाडी स्मशानभूमीत दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीय आणि नातेवाईक उपस्थित होते. विजयपत सिंघानिया हे फक्त यशस्वी व्यावसायिकच नव्हते, तर ते एक धाडसी वैमानिक देखील होते. त्यांच्या नेतृत्वाखाली रेमंड ग्रुपने भारतासह जागतिक बाजारपेठेत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यांच्या या कर्तुत्वामुळे संपूर्ण जगात भारताचं नाव मोठं झालं. त्यांच्या निधनानं भारतीय उद्योगसृष्टीची मोठी हानी झाली आहे. ‘कम्प्लीट मॅन’ म्हणून रेमंड समूहाला त्यांनी भारतातील घराघरात पोहोचवलं. रविवारी दुपारी १.३० वाजता कुटुंबीय आणि मित्रांना अंतिम दर्शनासाठी हवेली, एल.डी. रुपारेल मार्ग इथं जमण्याची विनंती केली होती. त्यानंतर दुपारी तीन वाजता चंदनवाडी इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
भारतीय हवाई दलानं विजयपत सिंघानिया यांना मानद एअर कमोडोर हा दर्जा दिला होता. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी भारतीय हवाई दलानं विजयपत सिंघानिया यांना आदरांजली वाहिली. यावेळी पुष्पहार अर्पण करून सिंघानिया यांना आदरांजली वाहिली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विजयपत सिंघानिया यांना आदरांजली वाहिली. ‘रेमंड समुहाचे माजी अध्यक्ष तसेच प्रख्यात वैमानिक, पद्मभूषण पुरस्कार विजेते विजयपत सिंघानिया यांच्या निधनाची वार्ता अतिशय दुःखदायक आहे. विजयपत सिंघानिया हे केवळ रेमंडमधील त्यांच्या नेतृत्वासाठीच नव्हे, तर विमानचालनाविषयीच्या त्यांच्या उत्कटतेसाठी देखील ओळखले जात होते. त्यांनी हॉट एअर बलूनद्वारे सर्वाधिक उंची गाठण्याचा जागतिक विक्रमही प्रस्थापित केला होता. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती प्रदान करो तसेच सिंघानिया कुटुंबीय आणि रेमंड परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली,’ म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंघानिया यांना आदरांजली वाहिली. विजयपत सिंघानिया यांच्या नावावर अनेक जागतिक विक्रम होते. १९८८ मध्ये त्यांनी यूके ते भारत असा मायक्रोलाईट विमानाचा एकट्यानं उड्डाण करुन इतिहास रचला. २००५ मध्ये त्यांनी हॉट एअर बलूनमधून सर्वाधिक उंची गाठण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. त्यांनी बॉम्बे (मुंबई) चे शेरीफ म्हणूनही काम केलं होतं. विजयपत सिंघानिया हे केवळ एक यशस्वी व्यावसायिकच नव्हते, तर ते एक धाडसी वैमानिक आणि दूरदर्शी नेतेही होते. त्यांच्या नेतृत्वाखाली, रेमंड ग्रुपने केवळ भारतीय बाजारपेठेत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळवली. त्यांना भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. व्यवसायापलीकडं त्यांना आकाशाची विशेष आवड होती. त्यामुळं त्यांना भारतीय हवाई दलात मानद एअर कमांडर हा दर्जा मिळाला होता.

