नवी दिल्ली : जगातील आघाडीची राईड-हेलिंग कंपनी उबरने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने सुमारे ३,३०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केल्यानंतर आता ‘वर्क फ्रॉम होम’ (घरून काम) धोरणातही मोठे बदल केले आहेत. नव्या धोरणानुसार, कंपनीतील केवळ सुमारे १ टक्के कर्मचाऱ्यांनाच कायमस्वरूपी घरून काम करण्याची परवानगी मिळणार असून उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयातूनच काम करावे लागणार आहे. बुधवारी कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या अधिकृत मेमोमधून ही माहिती देण्यात आली. सध्या उबरमध्ये जगभरात सुमारे ३० हजार कर्मचारी कार्यरत असून कर्मचारी कपातीनंतरही बहुतांश कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. कंपनीच्या मते, महामारीनंतरच्या अनुभवातून प्रत्यक्ष कार्यालयात एकत्र काम केल्यास निर्णयप्रक्रिया अधिक वेगवान होते, समस्या सोडवणे सुलभ होते आणि टीममधील समन्वय अधिक प्रभावी राहतो. त्यामुळे घरून काम करण्याची सुविधा अत्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उबरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दारा खोस्रोशाही यांनीही कार्यालयीन वातावरणात काम करणे हे नवकल्पना, संवाद आणि कार्यक्षमतेसाठी अधिक उपयुक्त असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीने ही १ टक्क्यांची मर्यादा उद्दिष्ट नसून कमाल मर्यादा असल्याचे सांगितले आहे. म्हणजेच, अत्यंत अपवादात्मक परिस्थितीतच काही कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरून काम करण्याची परवानगी दिली जाईल. कोरोना महामारीच्या काळात आणि त्यानंतरच्या काही वर्षांत विविध शहरांतून घरून काम करण्याची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होती. मात्र आता कंपनीने पुन्हा कार्यालयीन कामकाजाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या शहरात कर्मचाऱ्यांची नोकरी आहे, त्याच शहरात राहून कार्यालयात हजेरी लावणे आवश्यक ठरणार आहे.
उबरने विविध विभागांसाठी निश्चित कार्यालयीन केंद्रेही जाहीर केली आहेत. जागतिक स्तरावरील टीम्सना न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को येथील कार्यालयांतून काम करावे लागणार असून प्रादेशिक टीम्सना त्यांच्या संबंधित प्रादेशिक केंद्रांमध्ये, तर स्थानिक टीम्सना देशातील निश्चित कार्यालयांमधून काम करावे लागेल. इंजिनीअरिंग विभागासाठी स्वतंत्र टेक हब निश्चित करण्यात आले असून व्यवस्थापकांना शक्य तितक्या त्यांच्या टीमसोबतच कार्यरत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांनी एकट्याने दूरस्थ पद्धतीने काम करण्याऐवजी कार्यालयीन वातावरणात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे, यावरही कंपनीने भर दिला आहे. यापूर्वी उबरमध्ये आठवड्यात तीन दिवस कार्यालयातून काम करण्याचे हायब्रिड धोरण लागू होते. हे धोरण कायम राहणार असले तरी आता त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. कर्मचारी आठवड्यातील तीन दिवस प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहतात की नाही, याची नियमित नोंद ठेवली जाणार असून केवळ धोरण जाहीर करण्यापुरते मर्यादित न राहता त्याचे पालन होत असल्याची खात्री कंपनी करणार आहे. अनेक कंपन्यांमध्ये हायब्रिड धोरण असले तरी उपस्थितीची कठोर तपासणी केली जात नाही; मात्र उबरने याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. कंपनीने कोणत्या कार्यालयांमध्ये सर्वाधिक कर्मचारी कपात झाली याबाबत माहिती दिलेली नसली तरी अनेक कर्मचाऱ्यांसमोर आता दुहेरी आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे नोकरी टिकवण्याची चिंता असून दुसरीकडे नोकरी कायम राहिल्यास संबंधित शहरात स्थलांतर करून कार्यालयातून काम करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. उबरच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर कॉर्पोरेट क्षेत्रात पुन्हा कार्यालयीन कामकाजाला प्राधान्य देण्याच्या प्रवृत्तीला आणखी बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
