ठाणे : सेवा संकल्प अभियानांतर्गत भिवंडी तालुक्यातील खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमात विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वृद्धाश्रमाला भेट देत ज्येष्ठ नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्या अडचणी, गरजा आणि अपेक्षा जाणून घेत विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांनी मार्गदर्शन करताना सेवा संकल्प अभियानामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. वृद्धांशी संवाद साधणे हा या अभियानातील अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाच्या विविध नागरिकाभिमुख योजना आणि सेवांची माहिती प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचावी, यासाठी अभियानांतर्गत जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ नागरिकांनी शासकीय योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा तसेच आवश्यक सेवांसाठी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. समाज कल्याण विभागाच्या प्रमुख उज्ज्वला सपकाळे यांनी उपस्थितांना वृद्धांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. आजच्या काळात वृद्धाश्रमांची गरज वाढत असली तरी मातोश्री वृद्धाश्रमात कुटुंबातील सदस्यांसारखे आपुलकीचे वातावरण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून त्यांच्या अनुभव, आशीर्वाद आणि मार्गदर्शनाचा सन्मान करण्यात आला. समाजाला प्रेरणा देणाऱ्या ज्येष्ठांच्या आशीर्वादातून त्यांच्या जीवनात आपुलकी, सन्मान आणि सुरक्षिततेचा प्रकाश पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून केवळ शासकीय योजना आणि सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविणे एवढ्यावर भर न देता, समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा समजून घेऊन प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास व संवाद अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेचा उत्तम आदर्श ठरल्याचे उपस्थितांनी नमूद केले. कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छ भारत मिशन) पंडित राठोड, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी रोहित जाधव, ग्रामपंचायत अधिकारी परेश सोनावणे, मातोश्री वृद्धाश्रमाचे अधिकारी-कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेचे विविध अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना शासकीय योजनांविषयी जागरूकता निर्माण होण्यासोबतच त्यांना आवश्यक सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

