मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी विनाअनुदानित ४४ क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक पावले उचलण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित विभागांनी तातडीने सकारात्मक प्रस्ताव तयार करून पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. बनसोडे यांनी सांगितले की, खेळामुळे विद्यार्थ्यांचा केवळ शारीरिक विकास होत नाही, तर त्यांच्यात नेतृत्वगुण, शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना यांसारख्या महत्त्वाच्या गुणांचाही विकास होतो. त्यामुळे सुदृढ, निरोगी आणि सक्षम राष्ट्रनिर्मितीसाठी क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. राज्यातील अनेक शाळा शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान न घेता विविध क्रीडा स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करतात. या स्पर्धांमध्ये हजारो विद्यार्थी मेहनतीने सहभाग घेतात आणि उत्कृष्ट कामगिरीही करतात. मात्र, अशा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची शैक्षणिक पातळीवर पुरेशी दखल घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या क्रीडा यशाला शैक्षणिक गुणांकनात योग्य स्थान मिळावे, यासाठी क्रीडा सवलतीचे गुण देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच राज्यातील शाळांमध्ये क्रीडा संस्कृती अधिक बळकट होण्यास मदत होईल, असेही बैठकीत नमूद करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शालेय खेळ क्रीडा संस्थेने केलेल्या मागणीनुसार, इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या चार लाखांहून अधिक विद्यार्थी विनाअनुदानित ४४ क्रीडा प्रकारांमध्ये तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रीडा कौशल्याच्या आधारे शालेय गुणांकनात सवलतीचे गुण देण्यात यावेत, अशी मागणी संस्थेने शासनाकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत संबंधित विभागांनी या प्रस्तावाची सकारात्मक दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला अधिक वाव मिळावा, त्यांना उच्च शिक्षण आणि स्पर्धात्मक क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच पालक आणि शाळांचा क्रीडेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक व्हावा, या उद्देशाने हा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जात आहे. बैठकीला शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिव रुपाली सावंत, क्रीडा संचालनालयाचे उपसंचालक नवनाथ फरताडे, क्रीडा विभागाचे कक्ष अधिकारी कुणाल सरपाते, शालेय शिक्षण विभागाचे सहायक कक्ष अधिकारी दारासिंग दुल्हत, महाराष्ट्र राज्य शालेय खेळ क्रीडा संस्थेचे अध्यक्ष शाम राजाराम भोसले, विविध विनाअनुदानित शालेय खेळांचे प्रशिक्षक तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने लवकरात लवकर प्रस्ताव अंतिम करण्यावर भर देण्यात आला असून, याबाबतचा निर्णय झाल्यास राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना त्याचा थेट लाभ मिळण्याची शक्यता आहे.

