वृत्तसंस्था : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या **’कौन बनेगा करोडपती’**च्या अठराव्या पर्वाचे सूत्रसंचालन करत असून, नेहमीप्रमाणे आपल्या दमदार शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. मात्र यंदाचा हंगाम त्यांच्यासाठी भावनिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक ठरत असल्याचं त्यांनी स्वतः सोशल मीडियावर सांगितलं आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात आणि त्यांच्या ब्लॉगमधून अनेकदा वैयक्तिक भावना व्यक्त करत असतात. नुकत्याच केलेल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये त्यांनी ‘केबीसी’च्या चित्रीकरणादरम्यान येणाऱ्या भावनिक क्षणांविषयी मन मोकळं केलं. स्पर्धक त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, वेदना आणि कठीण प्रसंग सांगतात, तेव्हा त्या कथा ऐकून स्वतःच्या भावना आवरणं कठीण होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. इतकंच नव्हे, तर अशा प्रसंगी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुढे सुरू ठेवणंसुद्धा अवघड होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्येही भावनिक वातावरण निर्माण झालं असून, बिग बींच्या मनातील वेदना अनेकांना जाणवल्या.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये या अनुभवाबद्दल अधिक बोलणं टाळलं. सूत्रसंचालक म्हणून आपल्या भूमिकेचे काही पैलू उघड होऊ नयेत, म्हणून यावर जास्त भाष्य करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र हा अनुभव अत्यंत हृदयद्रावक असल्याचं सांगताना त्यांनी, “आता निवृत्त व्हावंसं वाटतंय,” अशी भावनिक प्रतिक्रिया दिली. अनेक दशकांपासून अभिनय आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात सक्रिय असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, छोट्या पडद्यावरील व्यस्त वेळापत्रकासोबतच ते त्यांच्या आगामी ‘कल्की २८९८ एडी’ या बहुचर्चित चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या तयारीतही व्यस्त आहेत. त्यामुळे निवृत्तीबाबत त्यांनी भावनिक भावना व्यक्त केल्या असल्या, तरी सध्या ते आपल्या कामात तितक्याच समर्पणाने कार्यरत असल्याचं दिसून येत आहे.

