नवी दिल्ली : शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप करत संयुक्त किसान मोर्चा (SKM) आणि ‘CJP’ (सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस) यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवरील दाखल करण्यात आलेले खटले अद्याप मागे घेण्यात आले नसल्यामुळे शेतकरी संघटना आणि युवा नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे संघटनांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते राकेश टिकैत आणि CJPच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर केंद्र सरकारवर दबाव वाढवण्यासाठी आगामी १० ऑगस्ट रोजी देशभरात ‘जेल भरो’ आणि ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
संघटनांच्या म्हणण्यानुसार, शेतकरी, विद्यार्थी आणि युवकांना एकत्र आणून नव्या रणनीतीनुसार हे देशव्यापी आंदोलन राबविण्यात येणार आहे. विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनाची तयारी सुरू असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. दरम्यान, १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘जेल भरो’ आणि ‘रास्ता रोको’ आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेवर तसेच कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजनांची तयारी केली जाण्याची शक्यता असून, या आंदोलनाकडे देशभरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

