रायगड : कोकण आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा पोलादपूर–महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट ३ जुलै ते ७ जुलैदरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अतिवृष्टीचा इशारा, घाट परिसरातील भूस्खलनाचा वाढता धोका आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. या कालावधीत नागरिकांनी आंबेनळी घाटाचा वापर टाळावा आणि प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला. पावसामुळे घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका अधिक वाढला असून, कोणतीही दुर्घटना किंवा जीवितहानी होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सह्याद्री पर्वतरांगेतील आंबेनळी घाट हा अतिसंवेदनशील आणि भूस्खलनप्रवण घाट म्हणून ओळखला जातो. तीव्र उतार, खोल दऱ्या, अस्थिर माती, विदीर्ण बेसॉल्ट खडक आणि सततचा मुसळधार पाऊस यामुळे या परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. गेल्या आठवडाभरात पोलादपूर हद्दीत दोन वेळा मोठ्या दरडी कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. या घटनांमुळे घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला.
सध्या आंबेनळी घाटात संरक्षण भिंती उभारणे, सुरक्षारक्षक कठडे बसविणे, पाण्याचा निचरा सुधारण्याची कामे तसेच इतर सुरक्षाविषयक उपाययोजना सुरू आहेत. मात्र, प्रतिकूल हवामान आणि सतत सुरू असलेल्या पावसामुळे नैसर्गिक आपत्तीचा धोका कायम असल्याने ही कामे सुरू असतानाच वाहतूक बंद ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. प्रशासनाने पुणे, सातारा, महाबळेश्वर तसेच कोकणाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. महाड–माणगाव–ताम्हिणी घाट मार्ग किंवा पोलादपूर–चिपळूण–कराड मार्गाचा पर्याय स्वीकारण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच घाटबंदीच्या आदेशाचे काटेकोर पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, विशेषतः अतिवृष्टीच्या काळात घाटमार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. हवामानाचा अंदाज आणि घाटातील परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात असून, परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच वाहतूक पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याने वाहनचालकांनी प्रशासनाला सहकार्य करून केवळ अधिकृत पर्यायी मार्गांचाच वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

