मुंबई : महाराष्ट्राचा सर्वात मोठा आणि लाडका सण असलेल्या श्रीगणेशोत्सवाला राज्य शासनाने ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ म्हणून अधिकृत दर्जा दिल्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेने यंदाच्या उत्सवासाठी व्यापक तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सव अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक गणेश मंडळांची धावपळ कमी करण्यासाठी यंदा परवानगी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली असून २१ जुलैपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. मंडळांना परवानगी किंवा जुन्या परवानग्यांचे नूतनीकरण करण्यासाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. संकेतस्थळावरील ‘नागरिकांकरिता’ या विभागातील ‘अर्ज करा’ या पर्यायातून ‘मंडप (सार्वजनिक गणेशोत्सव/नवरात्रोत्सव/इतर उत्सव)’ या सुविधेद्वारे अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर स्थानिक पोलीस ठाणे किंवा वाहतूक पोलिसांकडील ना-हरकत प्रमाणपत्रासाठी मंडळांना स्वतंत्र फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. महापालिकेची अंतर्गत यंत्रणाच ही प्रक्रिया पूर्ण करणार असून विभागीय सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळ उपायुक्त यांच्या देखरेखीखाली परवानगी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होत असून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी महापालिकेने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. रस्ते आणि पदपथांचे नुकसान टाळण्यासाठी खड्डेविरहित आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनच मंडप उभारावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करून रस्ते किंवा पदपथावर खड्डे खणल्याचे आढळल्यास संबंधित मंडळाकडून रस्त्याच्या दुरुस्तीचा संपूर्ण खर्च वसूल करण्यात येईल, तसेच प्रत्येक खड्ड्यासाठी स्वतंत्र आर्थिक दंडही आकारण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईतील मूर्तिकारांना आतापर्यंत तब्बल ९०७ टन शाडू माती मोफत वितरित करण्यात आली आहे. याशिवाय ९७९ मूर्तिकारांना मूर्ती तयार करण्यासाठी आणि सुकवण्यासाठी तात्पुरत्या मंडपांसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईत विक्रीसाठी येणाऱ्या अनेक मूर्ती कोकणातून येत असल्यामुळे तेथील मूर्तिकारांनाही शाडू माती व आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिकेने कोकण विभागीय आयुक्तांशी विशेष पत्रव्यवहार केला आहे. गणेश मंडळांनी देखावे आणि सजावटीसाठीही नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले असून पर्यावरण संवर्धन, नागरिकांची सुरक्षितता आणि गणेशोत्सवाची परंपरा जपत यंदाचा उत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्यासाठी मुंबईकर आणि गणेशभक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
- २१ जुलैपासून ऑनलाईन परवानगी प्रक्रिया सुरू होणार.
- एकाच संकेतस्थळावर अर्ज व नूतनीकरणाची सुविधा.
- ना-हरकत प्रमाणपत्रासाठी पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही.
- रस्ते किंवा पदपथावर खड्डे खणल्यास दुरुस्ती खर्चासह मोठा दंड.
- ९०७ टन शाडू मातीचे मूर्तिकारांना मोफत वाटप.
- ९७९ मूर्तिकारांना तात्पुरत्या मंडपासाठी मोफत जागा.
- कोकणातील मूर्तिकारांनाही शाडू माती उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार.
- पर्यावरणपूरक सजावटीचा वापर करण्याचे आवाहन.

