ठाणे : शहरात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेत ३०० हून अधिक रस्ते कर्मचाऱ्यांना हृदय-पुनर्जीवन (CPR) आणि प्राथमिक उपचारांचे विशेष प्रशिक्षण दिले आहे. किम्स हॉस्पिटल, ठाणे यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये घरपोच सेवा कर्मचारी, वाहतूक स्वयंसेवक आणि वाहतूक नियामक यांचा समावेश होता. अपघातानंतरचे पहिले काही क्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या ‘सुवर्ण तासां’मध्ये योग्य आणि तातडीची मदत मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात, या उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान अपघातग्रस्तांची स्थिती ओळखणे, त्वरित प्राथमिक उपचार करणे, CPR देणे तसेच वैद्यकीय मदत येईपर्यंत आवश्यक काळजी घेणे याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. ठाणे शहरातील गजबजलेल्या रस्त्यांवर हे कर्मचारी सतत कार्यरत असल्याने अपघातस्थळी सर्वप्रथम पोहोचण्याची शक्यता त्यांचीच असते. त्यामुळे त्यांना प्रशिक्षित करून आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ठाणे वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार, केवळ २०२४ मध्ये शहरात ९२२ रस्ते अपघातांची नोंद झाली असून त्यात २१५ जणांचा मृत्यू झाला, तर ८४० जण गंभीर जखमी झाले आहेत. ही चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात १०० घरपोच सेवा कर्मचारी, १०० वाहतूक स्वयंसेवक आणि १०० वाहतूक नियामक यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. किम्स हॉस्पिटलचे आपत्कालीन वैद्यक विभागप्रमुख डॉ. अंकित बियानी यांनी सांगितले की, “घरपोच सेवा कर्मचारी आणि वाहतूक स्वयंसेवक हे अनेकदा अपघातस्थळी सर्वप्रथम पोहोचतात. योग्य प्रशिक्षणामुळे ते रस्त्यावर जीव वाचविण्यात मोठी भूमिका बजावू शकतात.” तर किम्स हॉस्पिटलचे प्रादेशिक संचालक सौरभ गुप्ता यांनी “वेळेवर मिळालेली मदत ही जीवन आणि मृत्यूतील फरक ठरवू शकते. त्यामुळे रस्त्यावर आधीपासून उपस्थित असलेल्या व्यक्तींना प्रशिक्षित करणे अत्यंत आवश्यक आहे,” असे नमूद केले. ठाणे वाहतूक पोलिसांचे उपपोलीस आयुक्त पंकज नवनाथ शिरसाठ यांनीही या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत, “वाहतूक स्वयंसेवक आणि रस्ता सुरक्षा पथक अपघातस्थळी सर्वप्रथम पोहोचतात. त्यांना CPR आणि प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण दिल्याने ते अधिक वेगाने आणि जबाबदारीने मदत करू शकतील,” असे सांगितले. ठाण्यातील रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि गंभीर जखमा कमी करण्यासाठी समुदायाच्या सहभागातून उभारण्यात आलेली ही आपत्कालीन तयारीची साखळी भविष्यात अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

