नवी मुंबई : सध्या, ठाण्याहून नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी एकतर कळवा नाक्यावरच्या गर्दीतून वाट काढावी लागते किंवा पूर्व द्रुतगती महामार्गावरून जावं लागतं, त्यामुळे ठाण्याहून नवी मुंबई विमानतळाला जाण्यासाठी सध्या किमान ९० मिनिटांचा वेळ लागतो. पण भविष्यात तो ३० मिनिटांपर्यंत कमी होऊ शकतो, कारण ठाणे आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणारा उन्नत दुहेरी मार्ग बांधण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरची वाहतूककोंडी कमी करण्यास आणि दोन शहरांमधली कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होणार आहे.
नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन ८ ऑक्टोबर २०२५ रोजी झालं आणि डिसेंबर २०२५ मध्ये विमानसेवा सुरू झाली. भविष्यात विमानसेवांची संख्या वाढली की विमानतळावरची वर्दळही वाढेल, त्यामुळे विमानतळाच्या कनेक्टिव्हिटीत सुधारणा करण्यासाठी विविध प्रकल्पांच्या योजना आहेत, ठाणे-नवी मुंबई विमानतळादरम्यानचा उन्नत मार्ग हा त्याचाच एक भाग आहे. ठाण्यात दिघामधल्या पटनी मैदान इथून हा उन्नत मार्ग सुरू होईल, वाशीतल्या पाम बीच रोडपर्यंतचा सुमारे १७ कि.मी. चा मार्ग ठाणे-बेलापूर महामार्गाला समांतर असेल, त्याच्या पुढे नवी मुंबई विमानतळापर्यंतचा नऊ कि.मी.चा उन्नत मार्ग दुमजली (डबल डेकर) बांधण्यात येणार आहे. या मार्गावर धावणाऱ्या वाहनांना ताशी १०० कि.मी. वेगाची मर्यादा असेल, सहा ठिकाणी इण्टरचेंजेस असतील. त्याचा फायदा ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि मीरा-भाईंदर भागातल्या प्रवाशांना होईल. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने २०२५च्या सप्टेंबरमध्ये वा प्रकल्पाला मंजुरी दिली. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ६.३६३ कोटी रुपये एवढा आहे. पीपीपी तत्त्वावर बांधण्यात येणाऱ्या या मार्गाची उभारणी सिडको करेल. या उन्नत मार्गाचा वापर करण्यासाठी टोलही द्यावा लागणार आहे. पर्यावरणीय आणि नियामक मंजुऱ्या मिळवण्याचं काम करण्यासाठी सिडकोला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. बांधकाम सुरू झाल्यानंतर पुढच्या तीन वर्षांत मार्ग बांधून पूर्ण करण्यात येईल.

