कल्याण : ‘मराठी बोलता येत नाही का, मराठी बोलताना लाज वाटते का,’ असे प्रश्न करून मंगळवारी सकाळी कल्याण पूर्वेतील अर्णव खैरे या महाविद्यालयीन तरूणाला अंबरनाथ-सीएसएमटी लोकलमध्ये ठाणे पर्यंतच्या प्रवासात एका टोळक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे आलेल्या मानसिक तणावातून अर्णवने घरी येऊन आत्महत्या केली होती. या मृत्युप्रकरणी अर्णवच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अर्णवला मारहाण करणाऱ्या लोकलमधील अज्ञात प्रवाशांविरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. अर्णवला लोकलमध्ये मारहाण करणाऱ्या चार ते पाच अज्ञात प्रवाशांचा शोध घेण्यासाठी कोळसेवाडी पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके रेल्वे पोलिसांच्या साहाय्याने मारहाण करणाऱ्या टोळक्याचा शोध घेत आहेत. लोकलमध्ये प्रवास करताना आपण एका प्रवाशाला गर्दीमुळे ‘थोडा आगे हो’ असे म्हणालो. त्यावेळी त्या प्रवाशाने आपणास ‘काय रे मराठी बोलता येत नाही का. मराठी बोलण्याची तुला लाज वाटते का,’ असे प्रश्न केले. आणि त्या प्रवाशासह इतर चार जणांनी आपणास मराठी-हिंदी विषयावरून बेदम मारहाण केली, अशी माहिती मारहाणीमुळे अस्वस्थ झालेल्या अर्णवने आपल्या वडिलांना दिली होती.
या मारहाणीनंतर अर्णवला या टोळक्याकडून पुन्हा मारहाण होईल म्हणून ठाणे रेल्वे स्थानकात उतरला. तेथून तो पाठीमागच्या लोकलने मुलुंडच्या केळकर महाविद्यालयात गेला. तेथे मन रमत नसल्याने तो प्रॅक्टिल पूर्ण करून घरी आला होता. पोटात ठोशाबुक्क्यांंनी मारहाण झाल्याने त्याला मळमळत आणि त्रास होत होता. ही माहितीही त्यांनी वडिलांना दिली होती. घरी संध्याकाळी सात वाजता वडील घरी आल्यावर त्याने दरवाजा ठोठावला. आतून दरवाजा बंद होता. बराच उशीर दरवाजा उघडला जात नाही म्हणूुन अर्णवचे वडील जितेंद्र खैरे यांना संशय आला. त्यांनी शेजाऱ्यांची मदत घेऊन जोर लावून दरवाजा उघडला. त्यांनी शय्यागृहात जाऊन पाहिले तर मुलगा अर्णवने ओढणीने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. लोकलमध्ये झालेल्या मारहाणीमुळे आलेल्या मानसिक तणावातून अर्णवने आत्महत्या केली असल्याची तक्रार जितेंद्र खैरे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली होती. याप्रकरणातील दोषींना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती. सुरूवातीला पोलिसांनी या मृत्युप्रकरणी अकस्मित मृत्युची नोंद केली होती. अर्णवच्या मृत्युप्रकरणी विविध क्षेत्रातून दबाव वाढू लागल्याने पोलिसांनी अर्णवच्या वडिलांच्या तक्रारीवरून लोकलमधील मारहाण करणाऱ्या अज्ञात प्रवाशांविरुध्द शनिवारी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील मारेकऱ्यांना शोधण्यासाठी दोन स्वतंत्र पथके तयार केली. अंबरनाथ, कल्याण ते ठाणे दरम्यानचे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही चित्रण तपासून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

