नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून देशभरात सायबर फसवणूक करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर विविध राज्यांतील शेकडो लोकांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढून तब्बल ८३.९७ कोटी रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडे असलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या तपासाच्या माहितीनुसार, ही टोळी ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली बेकायदेशीर बेटिंग आणि सायबर फसवणुकीचे जाळे देशभर पसरवत होती. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, WhatsApp आणि Telegram ग्रुपच्या माध्यमातून “गेम खेळून पैसे दुप्पट मिळवा”, “फक्त नशीब आजमवा आणि कमवा” अशा आमिषाच्या जाहिराती देऊन, टोळी सामान्य नागरिकांना आमिषं दाखवत होती. लोकांनी या आमिषाला बळी पडून लोकांनी अॅप डाउनलोड करत पैसे जमा केले. पण त्यानंतर ऑनलाईन गेमिंगचा खेळ थांबवला जायचा आणि अकाउंट ब्लॉक केले जायचे. त्यानंतर सर्व रक्कमे खात्यातून काढली जायची. या माध्यमातून आरोपींनी ८८६ वेगवेगळ्या बँक खात्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात व्यवहार केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार इम्रान उस्मानी मिनहाज शेख (वय ३२) याला पोलिसांनी सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली. इम्रान हा फसवणुकीसाठी बोगस बँक खाते उघडण्यासाठी नागरिकांकडून त्यांच्या पासबुक, एटीएम कार्ड आणि मोबाइल सिमकार्ड्स गोळा करून ठेवत असे. त्यानंतर ही माहिती तो इतर साथीदारांना देत असे, जे या खात्यांतून व्यवहार करून पैसे परदेशी खात्यांमध्ये ट्रान्सफर करत असत.

