ठाणे : शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे माध्यम नसून प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान आणि समाजात स्थान निर्माण करण्याची ताकद देणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक बालकाला वर्गात आपलेपणा, सन्मान आणि समान संधी मिळावी, यासाठी शिक्षण व्यवस्था अधिक सर्वसमावेशक होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाण्यातील ‘सत्कार रेसिडेन्सी’ येथे डॉ. रेवती श्रीनिवासन लिखित “Creating Classrooms Where Every Child Belongs” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार आनंद परांजपे, उपप्रादेशिक अधिकारी हेमांगिनी पाटील, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदे यांनी शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देत नाहीत, तर संपूर्ण पिढी घडवण्याचे महत्त्वाचे कार्य करतात, असे सांगत डॉ. रेवती श्रीनिवासन यांच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या शैक्षणिक योगदानाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्गातील वातावरण सर्वसमावेशक असणे गरजेचे असून हे पुस्तक शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी शाळांमधील प्रवेश प्रक्रियेसाठी सामान्य पालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख केला.
डॉ. रेवती श्रीनिवासन यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विशेष गरजा असलेल्या मुलांसह ग्रामीण, वंचित आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी विविध थेरपी सेंटर्स, समुपदेशन उपक्रम आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव लंडनच्या ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्येही करण्यात आला असून त्यांनी उभारलेला शैक्षणिक वारसा ठाण्यासाठी अभिमानास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रीनिवासन म्हणाल्या की, शिक्षणाचा खरा उद्देश केवळ साक्षरता नसून प्रत्येक बालकाच्या क्षमतेचा शोध घेऊन त्याला आत्मसन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबतच विशेष गरजा असलेली मुले, ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि वंचित घटकांतील मुलांसाठी अधिक संवेदनशील शिक्षण व्यवस्था उभी राहणे आवश्यक आहे. आधुनिक अध्यापन, विशेष थेरपी आणि सर्वसमावेशक शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार प्रगतीची संधी मिळाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या पुस्तकातून शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना प्रत्येक मुलाला समान संधी देणारे, संवेदनशील आणि सर्वसमावेशक वर्ग निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

