मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलजन्य, डासजन्य आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी केले आहे. ‘ईटीव्ही भारत’शी संवाद साधताना त्यांनी पावसाळ्यात सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छ आहार आणि परिसरातील स्वच्छता या बाबींना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. पिण्याचे पाणी नेहमी उकळून किंवा शुद्ध करूनच वापरावे, कारण दूषित पाण्याद्वारे विविध जंतू शरीरात प्रवेश करून अतिसार, कावीळ, विषमज्वर आणि इतर जलजन्य आजार होण्याची शक्यता असते, असे त्यांनी सांगितले. उघड्यावर विक्री होणारे अन्नपदार्थ शक्यतो टाळावेत तसेच घरात आणलेल्या भाज्या आणि फळे स्वच्छ धुऊनच वापरावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. पावसाळ्यात स्वच्छता, पौष्टिक आणि सुरक्षित आहार यांचे पालन केल्यास अनेक संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले. नागरिकांनी शक्यतो पाणी साचलेल्या डबक्यांतून चालणे टाळावे. मात्र, महापालिका कर्मचारी, फेरीवाले, हातमजूर तसेच नियमितपणे पावसात काम करणारे किंवा प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आठवड्यातून दोन वेळा प्रतिबंधात्मक औषधाचा डोस घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हरीश भांदिर्गे यांनी नागरिकांना घराच्या आणि परिसराच्या स्वच्छतेबाबतही विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले. घराभोवती किंवा परिसरात पाणी साचू देऊ नये, साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करावा आणि जुने टायर, नारळाच्या करवंट्या, रिकामे डबे तसेच पाणी साचू शकणाऱ्या इतर वस्तू हटवाव्यात. अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, चिकुनगुनिया आणि मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो, असे त्यांनी सांगितले. घरातील पाण्याच्या टाक्या नियमित स्वच्छ ठेवाव्यात आणि त्यावर झाकण असल्याची खात्री करावी, कारण अशा ठिकाणीही डासांची पैदास होऊ शकते. कणकण, ताप, सर्दी, खोकला किंवा इतर कोणतीही संशयास्पद लक्षणे आढळल्यास ती अंगावर न काढता त्वरित जवळच्या मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन वैद्यकीय तपासणी करून उपचार घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, संपूर्ण पावसाळ्यात मुंबईकरांना अखंड आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. जलजन्य आणि संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय प्रभावीपणे राबविणे, औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवणे तसेच सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये आवश्यक मनुष्यबळ तैनात ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी महापालिका यंत्रणा सतर्क असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

