वृत्तसंस्था : हिंदी चित्रपटसृष्टीत असे काही अभिनेता आहे, ज्यांनी आपल्या मेहनतीनं एक विशेष स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलं आहे. आता आम्ही ‘सिंघम’ स्टार अजय देवगणबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. २ एप्रिल रोजी त्याचा वाढदिवस असून तो आज ५७ वर्षांचा झाला आहे. हा दिवस अभिनेत्यासाठी खूप विशेष आहे. अभिनेत्यानं परिश्रम आणि संघर्षातून आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. त्यानं चित्रपटसृष्टीत अनेक दमदार चित्रपट दिले आहेत. यात ‘दृश्यम’, ‘तान्हाजी’, ‘टोटल धमाल’, ‘सिंघम’, ‘शैतान’, ‘रेड’ आणि ‘गोलमाल’ यांचा समावेश आहे.
याशिवाय अभिनेत्यानं आर. माधवनबरोबर ‘शैतान’ चित्रपटात जबरदस्त भूमिका साकारली होती. त्याचा हा चित्रपट हिट ठरला होता. दरम्यान अजय देवगणनं आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९९१ मध्ये ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात त्यानं धोकादायक स्टंट केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर, त्यानं ‘जिगर’, ‘एक ही रास्ता’, ‘बेदर्दी’, ‘दिलवाले’, ‘विजयपथ’, ‘सुहाग’, ‘नायाज’, ‘गुंडराज’, ‘दिलजले’, ‘जंग’, ‘इश्क’, ‘जख्म’, ‘प्यार तो होना ही था’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘युवा’ आणि ‘गंगाजल’ यांसारख्या अनेक चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचं मनं जिंकलं होतं. अजय आताही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. अजय देवगणचे वडील, वीरू देवगण, एक गँगस्टर होते, असं अभिनेत्यानं अलीकडेच एका मुलाखतीत सांगितलं. ते लहान वयातच घरातून पळून गेले आणि कंगाल अवस्थेत मुंबईत आले होते. अजयनं पुढं सांगितलं होतं की, त्याचे वडील वीरू यांच्याकडे पैसे आणि राहायला जागा नसल्यामुळं त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं. त्यानंतर, एका माणसानं त्यांना राहण्याची सोय आणि गाड्या धुण्याचे काम दिलं. त्यांनी अनेक छोटी-मोठी कामे केली. अखेर सायन-कोळीवाडा भागातील ते गँगस्टर बनले. एका छोट्याशा रस्त्यावरील मारामारीदरम्यान, प्रसिद्ध ॲक्शन दिग्दर्शक रवी खन्ना यांनी त्यांना पाहिलं. त्यानंतर त्यांनी अजय देवगणचे वडील वीरू यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये स्टंटमॅन म्हणून काम करण्याची संधी दिली. यानंतर त्यांचे आयुष्य बदलून गेले. त्यांनी ८०-९० च्या दशकात ते इंडस्ट्रीतील सर्वात दमदार स्टंटमॅनपैकी एक म्हणून उदयास आले. दरम्यान अजय देवगणनं इंडस्ट्रीमध्ये एक नायक म्हणून खूप जास्त मेहनत केली. तसेच अभिनेत्याच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्याकडे अंदाजे ४५० कोटींची मालमत्ता असल्याचं म्हटले जाते.

